https://www.google.com/adsense/new/u/0/pub-4475133060821869/sites/detail/url=bkilche.blogspot.com चौफेर : April 2023
animated-fireworks-image-0061 animated-rose-image-0045चौफेर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे animated-rose-image-0045 मी कोणाला शिकवत नाही मी फक्त ते शिकू शकतील असे वातावरण देतो” - अल्बर्ट आईन्स्टाईन 💐💐💐💐 चौफेर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे 💐💐💐💐 चौफेर ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद💐💐💐💐 animated-bird-image-0155 -image-1310" />

Saturday, April 29, 2023

शिवसेनेची राजकीय अस्वस्थता…

 शिवसेनेची राजकीय अस्वस्थता…






महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेली शिवसेना दोन गटात विभागल्यामुळे, एका गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह मिळालेले आहे तर अद्यापही दुसऱ्या गटाची कायदेशीरदृष्ट्या  नोंदणी झालेली नसली तरीही या दोन्ही गटातील वाद पाहता येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेमके लोकमत कोणत्या शिवसेनेच्या बाजूने आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसणार आहे. खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या वादासंदर्भात ज्यावेळेस निवडणूक आयोगात लढाई चालू होती त्यावेळी शिंदे गटाला खऱ्या अर्थाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे नाव हवे होते. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मूळ शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे आले असले  तरी शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण पाहता  ठाकरे शिवाय असलेली शिवसेना शिंदेला किती झेपावेल हा ही वादाचा विषय आहे.

शिवसेनेच्या निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यातूनच त्यांच्या खेड, मालेगाव, पाचोरा आणि महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता मूळ शिवसेना पक्षातील नेत्यांची अस्वस्थता मात्र दिवसेंदिवस वाढत  आहे. शिंदे सोबत आलेल्या शिवसेना नेत्यांचे वर्तन आपण जर तपासले तर त्यांच्या वर्तनामध्ये कधीही एकसारखेपणा दिसून येत नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेतील नेत्यांचे, प्रवक्त्याचे तोंड हे बारा दिशेकडे असल्याचे आपल्याला दिसून येते. वास्तविक पाहता हिंदुत्वापासून फारकत घेतली म्हणून बाहेर पडणारा हा गट कधी हिंदुत्व बाजूला सारतो, आणि हो आम्ही कधी खोके घेतले  म्हणतो, तर कधी गद्दारी केली ती शिंदेंसाठी,  गद्दारी केली ती मराठा मुख्यमंत्री होण्यासाठी अशी वेगवेगळी विधान करून आपल्या मनातला संभ्रम हा आणखी मोठ्या प्रमाणात वाढवताना दिसत आहे. 


शिंदे गटाकडे मुळ शिवसेना आली असली तरी पूर्वीच्या शिवसेनेत असलेला जो आत्मविश्वास होता तो आज ना शिंदे मध्ये दिसतो ना शिंदे गटामधल्या नेत्यांमध्ये दिसतो. त्यामुळे ठाकरे ज्या ठिकाणी सभा घेतात त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गट सभा घेताना आपल्याला दिसून येतो. ज्या मतदारसंघांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरेंची सभा असते त्या ठिकाणचे शिंदे शिवसेनेचे स्थानिक नेते एवढे सैराभर झालेले आहेत की ते आता उद्धव ठाकरेंनाही आव्हान देऊ लागले आहेत.त्यातूनच संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांचा हा दिवस खराब जातो. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना ज्या पद्धतीने वैचारिक पार्श्वभूमी आणि विचाराची लढाई विचारा ने करणे आवश्यक असताना ती लढाई मात्र शिवसेनेचे नेते करताना दिसून येत नाहीत कारण त्यांच्या अंगी असलेला स्थायीभाव आता मोठ्या प्रमाणात उफाळून येतोय.


शिवसेना नेत्यांनी हाच स्थायीभाव जर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दाखवला असता तर उद्धव ठाकरेंना बोलण्यात आणि दोष देण्यात यांचा वेळ गेला नसता हे ही तेवढेच खरे आहे. पण हे तत्कालीन शिवसेनेच्या नेत्यांनी न करता आम्ही म्हणजेच शिवसेना हे विधान करून शिवसेना निवडणूक आयोगातून मिळवली परंतु आज शिवसेनेच्या नेत्याची वैचारिकता पाहता मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेनेच्या नेत्यांना वैचारिक पार्श्वभूमी नसल्यामुळे त्यांची लढाई आता हात घाई वर आल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे कालच्या  पाचोर्‍यांच्या सभेत तर खुद्द जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना संजय राऊत यांना सांगावे लागले की सभेत योग्य ते बोलावे अन्यथा आम्ही घुसू  यावरून पालकमंत्र्याचे वर्तन हे टपोरीपणाचे दिसून आले, पालकमंत्र्यांची जी काही भाषा आहे ती भाषा टपोरी असल्याचे आपल्याला दिसून येते. पालकमंत्री जर टपोरी  भाषा वापरत असतील तर सर्वसामान्यांच्या भाषेत मग त्यापेक्षा काय फरक पडणार  हा ही एख संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे जबाबदार व्यक्तीने पदावर असताना कशी भाषा वापरावी याचे प्रशिक्षण हे शिवसेनेच्या नेत्यांना देणे आता गरजेचे आहे. 


शिवसेनेच्या नेतृत्वाचे आजचे वर्तन पाहता त्या नेत्यांना कोणीही विरोध करू नये अशीच त्यांची भूमिका आणि भावना सध्याच्या परिस्थितीत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेच्या नेत्यांची होत असलेली दमछाक  हे काही सर्व सांगून जाते. शिवसेनेच्या नेत्यांना आता खरंच शांततेच्या मार्गाने होणाऱ्या प्रत्येक वाराला उत्तर देणे गरजेचे असताना आपली आक्रमकता दाखवणे हे  योग्य नाही. कारण शिवसेनेच्या नेत्यांवर जे काही आरोप होत आहेत त्या आरोपाचे ते एक प्रकारे आक्रमकतेच्या माध्यमातून समर्थन करताना दिसून ते येतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदेंवर अन्याय झाला ही जी  जनमानसात जी काही भावना होती ती भावना शिवसेनेच्या नेत्यांच्या वर्तणुकीमुळे पूर्णपणे लयास गेली आहे. ही वस्तुस्थिती शिवसेनेचे नेते सध्या मान्य करणार नाहीत.  दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या विषयी असलेली सहानुभूती शिवसेनेचे नेते मान्य करतात ह्यातच शिंदे शिवसेनेचा मोठा पराभव आहे.


शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आलेली अस्थिरता ही जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत राहणार असली तरीही सोबतच जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तर ही अस्थिरता आणखी वाढवून परिणामी त्या अस्थिरतेचे स्वरूप वाढून  नैराश्य ही येऊ शकते याची जाणीव शिवसेना नेत्यांना असणे गरजेचे आहे. एकंदरीतच शिवसेनेच्या नेत्यांच्या आजच्या भूमिका पाहता शिवसेनेच्या नेत्यांच्या स्वतःच्या राजकारणावर व क्षमतेवर त्यांचा विश्वास नसल्यामुळे ही परिस्थिती आज त्यांच्यावर ओढवलेली आहे. आज शिवसेनेत तीन-तीन वेळा, चार चार वेळा विधानसभा लोकसभा जिंकणारे नेते असूनही त्यांना सत्तेचा राजकारणासाठी भाजपावर अवलंबून राहावे लागते हेच त्यांचे मूळ अपयश आहे. याचा अर्थ हे भाजपा शिवाय निवडून येऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि हीच वस्तूस्थिती भाजपने हेरल्यामुळे भाजपा देईल तेवढ्या जागांवर लढल्याशिवाय शिवसेने पुढे पर्याय नाही.


शिवसेना नेत्यांची अस्वस्थता वाढते ती भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या भूमिकेमुळे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना असे वाटतेय की आम्ही ज्या स्वतःच्या जागा लढणार आहोत त्याही जागा आम्हाला मिळतात की नाही याचीही साशंकता ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात  आहे.सोबतच सत्तेत असूनही अध्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही त्यामुळे मंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असणारे शिवसेनेचे काही आमदार हे ही अस्वस्थ आहेत. तसेच वेगवेगळ्या समाज माध्यमातून आणि प्रसार माध्यमातून होणारी रोजची विटंबना आणि अपमान हे शिवसेनेचे नेते सहन करू शकत नाहीत. तसेच दिल्लीत सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अशी वातावरण निर्मिती करून पुन्हा एकदा शिवसेना आणि शिवसेनेच्या नेत्यांना खिंडीत पकडल्या गेले आहे. त्यातूनच शिवसेनेच्या कार्यतत्पर मुख्यमंत्र्यांना  अचानक सुट्टी घेऊन आपली शेती करावीसी वाटते यातच सर्व काही लपल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांची अस्वस्थता ही दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी ही वाढतच आहे. शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाढलेली ही अस्वस्थता ओळखून महाराष्ट्राच्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगावे लागते की 2024 ची निवडणूक आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढणार आहोत,त्यामुळे उपमुख्यमंत्र्याच्या विधानात किती दम आहे आणि ह्या गोष्टी खऱ्या होतील का हे येणारा काळच सांगणार आहे. त्यातल्या त्यात भाजपाचा अंतर्गत आलेला सर्व्हे सर्व काही सांगून जाणारा असल्यामुळे शिवसेना नेत्यांची झोप मात्र उडालेली आहे. कारण ज्या भाजपच्या भरोशावर त्यांनी सत्ताकारणाचा पराक्रम केला  तोच पराक्रम आता त्यांच्यावर उलटतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे आणि अजित पवार यांच्या भूमिकेमुळे  शिवसेना नेत्यांची आता सध्या वाट लागते की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे. ज्या राष्ट्रवादीमुळे  हे शिवसेनेचे नेते सत्तेतून बाहेर आले त्याच राष्ट्रवादीने आमच्या भूमिका मान्य केल्या तर आम्ही त्यांचे स्वागत करू अशी विधान करून  सत्तेसाठीच महाराष्ट्रातले नेते आसुसलेले आहेत हे दाखवून देण्याचे काम शिवसेनेच्या नेत्याच्या वर्तनातून झालेले असल्यामुळे सध्याच्या शिवसेनेची आणि नेत्यांची अवस्था तेलही गेले आणि तूपही गेले हाती आले धुपटणे अशी झालेली आहे. 


एकंदरीतच शिवसेनेच्या अस्थिरतेतून महाराष्ट्रात आलेली  महाराष्ट्राच्या राजकारणाची अस्थिरता पाहता महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे काम इथल्या राजकीय वृत्तीने केलेले आहे आणि ती सत्तेची अहंकारी वृत्ती काही प्रमुख सत्ताधारी राजकीय पक्षांमध्ये असल्यामुळे राजकारणातील प्रबळ व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्या आरोपातून त्यांना स्वच्छ करण्यासाठी आपल्या छात्र छायेखाली घ्यायचे हा जो काही एक कलमी कार्यक्रम सध्या जोरात चालू आहे त्यावेळेस अशा राजकीय पक्षांना भ्रष्टाचाराविषयी बोलण्याचा कोणता नैतिक अधिकार आहे हे त्यांनी एकदा स्पष्ट करून महाराष्ट्रातील जनतेस सांगावे.प्रबळ राजकीय पक्षांनी राजकीय अस्थिरता कमी करून महाराष्ट्राला राजकीय अस्थिरते पासून वाचवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे  आहे. सोबतच  वेगवेगळ्या राजकीय पक्षांना अस्थिर करून सत्तेचे लोणी चाटायला लावण्याची प्रक्रिया बंद करण्यासाठी पुढाकार घेऊन सत्तेसाठी आसुसलेल्या नेत्यांचीही अस्वस्थता कमी करावी अन्यथा आपली ही अवस्था ही शिवसेना नेत्यासारखी  होईल हे दाखवून देणे गरजेचे आहे तेव्हाच खरा महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा राहील.



मोदीची गॅरंटी ; तरीही भाजपा समोर आव्हानच……

  मोदीची गॅरंटी ; तरीही  भाजपा समोर  आव्हानच…… नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात लोकसभेची सेमीफायनल भाजपने जिंकली असली तरीही, ...