https://www.google.com/adsense/new/u/0/pub-4475133060821869/sites/detail/url=bkilche.blogspot.com चौफेर : मंदिर मशीदीच्या वादातून …….
animated-fireworks-image-0061 animated-rose-image-0045चौफेर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे animated-rose-image-0045 मी कोणाला शिकवत नाही मी फक्त ते शिकू शकतील असे वातावरण देतो” - अल्बर्ट आईन्स्टाईन 💐💐💐💐 चौफेर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे 💐💐💐💐 चौफेर ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद💐💐💐💐 animated-bird-image-0155 -image-1310" />

Saturday, May 21, 2022

मंदिर मशीदीच्या वादातून …….

 


 मंदिर मशीदीच्या वादातून …….

       

Illustration: Soham Sen


भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. काळाच्या ओघात भारतीय  संस्कृतीवर अनेक परकीय आक्रमणे झाली असताना ही ती नष्ट न होता आजपर्यंत टिकून आहे.एकंदरीतच भारतीय संस्कृतीचे स्वरूप उपासना, त्याग, संयम, सहिष्णुता सारख्या  वैशिष्ट्यपूर्ण गुणांनी समृद्ध असताना ती आपणाला अंधारातून प्रकाशाकडे नेते.म्हणूनच भारतीय समाज हा सूर्यफुलासारखा विविधतेने नटलेला आहे.आज या विविधतेने नटलेल्या समाजाला खरी गरज आहे ती शांततेची आणि संयमाची. ज्यावेळी शांतता आणि संयम या दोन्ही गोष्टी हातात हात घेऊन चालतात त्याचवेळी एक नवीन क्रांती घडताना आपल्याला दिसून येते.त्यातुनच आज भारताने आज आपली संस्कृती संवर्धन आणि संरक्षण हे टिकवून ठेवलेलेले असतानाच आज संस्कृती संवर्धन आणि संरक्षणाच्या नावाखाली प्रत्येक समूहाला  आत्मकेंदित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.त्यातून जो तो आज आत्मकेंद्रित झाल्यामुळे  समाजाचा सारासार विचार कुणीही करत नाही, आणि याचाच फायदा सामाजिक ध्रुवीकरण करणाऱ्या टोळ्या घेताना आपल्याला दिसून येतात.त्यातून आज आपण मानवी समाजाचे एक घटक आहोत, आपण सर्व एक आहोत, सारखे आहोत, ही भावनाच शिल्लक उरलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. 

    आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात वाटचाल करताना  भारताने विज्ञान-तंत्रज्ञान आणि अवकाश क्षेत्रात  मोठी झेप घेतली असतानाच मात्र सामाजिक घटकांना मंदिर आणि मशीद या दोन केंद्राभोवती फिरवण्याची किमया  देशातल्या राजकीय नेतृत्वाने केली आहे.त्यातूनच देशात आज अजान आणि हनुमान चालिसा यावरून देशभरात गोंधळ सुरू आहे.सोबतच मंदिर आणि मशिदीशी संबंधित वाद भारतात  होणे हे काही आपल्यासाठी नवीन नाही. यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती राम मंदिर आणि बाबरी मशीदीच्या वादाची. त्यातूनच  आज बाबरी कोणी पाडली, यामध्ये कोणाचा सहभाग होता हे सांगण्यासाठी महाराष्ट्रामध्ये तर स्पर्धाच लागलेली असतानाच देशात मंदिर मशीद  प्रकरणावरून ज्ञानवापी मशीद बरोबरच आता ताजमहाल,कुतुबमिनार,आणि मथुरा  या संदर्भातही देशात वाद सुरू झाले आहेत.देशात आज अनेक वादग्रस्त स्थळे आहेत, ज्याबद्दल दोन्ही पक्षांची मते  भिन्न भिन्न आहेत ही वस्तुस्थिती असतानाच सध्या ज्ञानवापी मशीद-काशी विश्वनाथ वाद प्रकरणावरून देशातील धार्मिक वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातूनच देशात पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरणाची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात सुरु झाली.

    विविध धर्म आणि जातींच्या लोकांमध्ये द्वेष पसरवणारे नेते धार्मिक ध्रुवीकरणास खत पाणी घालतात.कारण सत्तेवर आपली पकड टिकवून ठेवण्यासाठी राजकारणी जाती आणि धर्माचे ध्रुवीकरण करतात. हे ध्रुवीकरण राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाहीच्या भावनेविरुद्ध असतानाही. राजकीय नेते  जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणापासून दूर राहात नाहीत.धर्म आणि जात याविषयी संवेदनशील असणारा समुह हा समाजात मोठ्या प्रमाणात असतो. कारण अल्लाहू अकबर, हिंदूधर्म खतरे मे है, मंदिर वही बनायेंगे म्हणताताच जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेणारी जमात, स्वार्थी राजकारणी, धर्माचे आणि जातीचे ठेकेदार महत्त्वाच्या मुद्द्यांपासून भरकटवण्यासाठी धर्म आणि जातीच्या नावाचा वापर  करतात.त्यातूनच वास्तविक पाहता परिपाठामध्ये शिकवली जाणारी भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही मूल्य आज पाळली जात नाहीत. त्यामुळे एकंदरीतच भारतीय शिक्षण व्यवस्था कमकुवत झाल्यासारखी दिसून येते. म्हणजेच ज्या ठिकाणची शिक्षण व्यवस्था कमकुवत झाली तो देश अधोगतीकडे जाताना आपल्याला दिसते ते चित्र आपल्या देशात लांब राहिले नाही. 

     आज मंदिर मशीद या विषयावर भावनिक करण्याचे प्रयत्न सुरु असतांनाच भारतीय समकालीन राजकारणाचे स्वरूप पाहता राष्ट्रीय एकात्मतेसाठी कोणताही राजकीय पक्ष पुढे येताना दिसत नाही. राष्ट्रीय एकात्मता हा केवळ संवैधानिक आणि घटनात्मक विषय नाही तर त्यासाठी प्रत्येकाच्या मनाची अवस्था बदलणे गरजेचे आहे. मी धर्माने, जातीने, भाषेने वेगळा असलो तरीही प्रथम भारतीय आहे हा विचार आज पुन्हा एकदा रुजू होण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.म्हणून मंदिर मशिदीच्या नावावर सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या शक्तींचा मुकाबला करण्यासाठी देशातील तरुणांनी, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, शिक्षणतज्ञ यांनी पुढे येण्याची आज मोठी गरज निर्माण झालेली आहे.सामाजिक सलोखा करण्यासाठी पुढे आलेल्या समूहाने केवळ तत्वतः सैद्धांतिक विचार मांडून चालणार नाही तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात कृती करणे गरजेचे आहे.आज मंदिर मशीदच्या नावाखाली सामाजिक जीवनात केला जाणारा अंतर्विरोध टाळण्यासाठी आम्ही एक आहोत हा विचार दृढ करणे गरजेचे आहे.कारण आपल्या देशातल्या १९९१ च्या प्रार्थनास्थळ कायद्यानुसार, १५ ऑगस्ट १९४७ ला ज्या ठिकाणी  मंदिर होतं, ते यापुढे ही मंदिर असेल आणि मशीद होती, ती यापुढे ही मशीदच असेल.असे असताना ही मंदिर मशिदीचे वाद  उभे करणे हे संयुक्तिक नाही.कारण  भारतीय संस्कृतीतील शिल्पकला पाहता  प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यावर धर्माचा खूप मोठा प्रभाव आहे.तसेच मध्ययुगीन कालखंडात भारतात इन्डो-इस्लामिक स्थापत्यकलेची सुरुवात झाली.त्यातुनच आज ज्ञानवापी मशीदीच्या संदर्भातील शिल्पकला  पाहता त्या शिल्पकलेचा हिंदू धर्माशी संबंध आहे हे ही मोठ्या प्रमाणात सांगितले जात आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी शिवलिंग सापडले असाही विचार पुढे येतोय, त्यातून दोन्ही पक्षकाराकडून वेगवेगळे दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत. वास्तविक पाहता नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच पण त्यातुन केले जाणारे धार्मिक ध्रुवीकरण सध्याच्या काळात देशाला परवडणारे नाही.देशात होणारे मंदिर मशिदीची वाद पाहता 1991 च्या कायद्याचा आधार आपण घेतला तर कोर्टाचा निर्णय ही त्या कायद्यालाच अनुसरूनच राहील ही एक वस्तुस्थिती आहे.

      एकंदरीतच देशातील या मंदिर मशिदीच्या वादाचा संदर्भात वाद न करता पुरात्त्वविद्या विषयात संशोधन, उत्खनन, सर्वेक्षण आणि अवशेषांचे जतन करणारी भारतातीय पुरातत्व संरक्षण संस्थेने यात हस्तक्षेप करून प्राचीन वास्तूंचा अभ्यास करावा, जेणेकरून भारतीय संस्कृतीचे आणखी नवीन पुरावे समोर येतील. मंदिर मशिद हा प्रश्न आज भावनिक केल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात अस्मिता जागृत होत आहे. त्या अस्मितेच्या आधारावर लोकांना भडकवणारी जी काही यंत्रणा या ठिकाणी कार्यरत झालेली आहे तिला आता स्वतः आपणच कुठेतरी थांबवणं ही काळाची गरज आहे.कारण आपल्याला येणाऱ्या काळात ज्या काही पिढ्या घडवायच्या त्या पिढ्या या भावनिक आणि अस्मितेवर चालणाऱ्या असल्या तर आपण जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करू शकणार नाही, त्यामुळे डॉ. एपीजे अब्दुल कलामांचे स्वप्न हे स्वप्नच राहील यात शंका नाही.

     आज देशात नवनिर्माण करण्यासाठी सर्जनशील अशी फळी तयार होणे अपेक्षित असताना, काही समाजविघातक आणि विध्वंसक लोकांना  सर्जनशीलता जोपासता येत नाही ते लोक मंदिर मशिदीचा वाद पुढे करून लोकांना सुसंस्कृत करण्याच्या ऐवजी लोकांना पुन्हा एकदा रानटी अवस्थेकडे नेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे येणाऱ्या काळात आपणास सुसंस्कृत व्हायचे का रानटी व्हायचे हे ठरवण्याची वेळ आता आलेली आहे. लोकांना रानटी करण्याची ही वेळ जर समाजविघातक आणि विध्वंसक लोकांनी साधली तर देशामध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. परिणामी श्रीलंकेचा भारत कधी होईल हे ही आपणास समजणार नाही. त्यामुळे कृपया हात जोडून सर्वांना विनंती आहे की आपण या देशाचे सुजाण नागरिक आहात. सुजाण नागरिकाचे जे काही सुजाण लक्षण आहे ते आपण पाळले पाहिजे. त्यासाठी आपली डोकी आज शांत ठेवणे गरजेचे आहे.अन्यथा मंदिर मशिदीच्या वादातून होणाऱ्या वेगवेगळ्या समस्येचे स्वरूप पाहता महाराष्ट्रातील समकालीन राजकीय परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहणे गरजेचे आहे.कारण लढायला बहुजनाना पुढे करणारी राजकीय नेतृत्वाची जमात बहुजनावर गुन्हे दाखल होताच, आपल्यावर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून पळणारे नेतृत्व आणि गॅलरीत उभे राहून लोकांना आपल्या नेतृत्वाची झलक दाखवणारी राजकीय संस्कृती ही महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलेली आहे.त्यामुळे वेळीच मंदिर मशिदीच्या वादातून सावधान होणे गरजेचे आहे.




 











No comments:

Post a Comment

मोदीची गॅरंटी ; तरीही भाजपा समोर आव्हानच……

  मोदीची गॅरंटी ; तरीही  भाजपा समोर  आव्हानच…… नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात लोकसभेची सेमीफायनल भाजपने जिंकली असली तरीही, ...